अर्जुनी मोर (प्रशांत ऊके)
गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव-बांध पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे जोमात सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी एक वर्षापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर परिसरातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची नागरिकांची तक्रार आहे.
अवैध धंद्यांना अभय?
नवेगाव-बांध परिसरात गोतस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कार्यवाही नगण्य आहे. अवैध दारू विक्री, सट्टा, जुगार यांसारख्या गैरप्रकारांना उत येत असताना पोलीस निरीक्षक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, अल्पवयीन मुला-मुलींचा लाजावर खेळ खंडोबा सुरु असून, परिसरातील चोऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
मोबाईल चोरी, शेती पिकांची लूट
सुमारे लाखोंच्या किंमतीचे १० मोबाईल २२ सप्टेंबर २०२४ रोजी आठवडी बाजारातून चोरीला गेले, मात्र अद्याप चोरट्यांचा शोध लागलेला नाही. तसेच, शेतकऱ्यांच्या घरातून धान्याच्या चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. एका प्रकरणात शेतकऱ्यांनी स्वतः चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते, मात्र तो पोलीस ठाण्यातून पळून गेला. ही गंभीर घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
जनतेशी असभ्य वर्तणूक
पोलीस निरीक्षकांचा नागरिकांशी व पत्रकारांशी असभ्य वर्तनाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. विशेषतः, शाळकरी विद्यार्थी अभ्यासासाठी पोलीस ठाण्यातील वाचनालयात जात असताना त्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची मागणी
शासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशनची निर्मिती केली आहे. मात्र, जर पोलीस निरीक्षक आणि बिट अंमलदार यांचे दुर्लक्ष असेच सुरू राहिले, तर कायदा सुव्यवस्थेचा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी निष्क्रिय पोलीस निरीक्षकांना तातडीने हटवून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. आता पाहावे लागेल की, वरिष्ठ अधिकारी याकडे किती गांभीर्याने लक्ष देतात आणि नागरिकांच्या मागणीकडे कसे पाहतात.